Breaking News

1/breakingnews/recent

2 एप्रिलपासून मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी, नियम काय असतील?

No comments


मुंबई -

गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही, अशी धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलपासून मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल. या लॉकडाऊनचे स्वरुप 50 टक्के लॉकडाऊन आणि 50 टक्के निर्बंध असे असतील.  मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. लॉकडाऊनच्या वर्षानंतरही अजूनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाल्याचे कळतं आहे. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.

कोरोनासोबतच लॉकडाऊन या शब्दानेही डोकं वर काढलंय. पण जर 2 एप्रिलला लॉकडाऊन लागलाच तर तो आधीच्या लॉकडाऊनहून वेगळा असणार आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाने  कुठली तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाने बंद केली जातील. मागील लॉकडाऊन हा सलग होता. म्हणजे, 24*7 सगळं बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे

मग प्रश्न येतो, भाजीपाला, किराणा आम्हाला मिळणार का? की हा आधीच भरुन ठेवायचा? तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. काहींचा प्रश्न असाही असू शकतो, की मागील वेळी जशा आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सुरुवातीला तरी असे केले जाणार नाही. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असे सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होते. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

हेच नाहीतर रेल्वेस्टेशन्स, विमानतळं, बसस्थानके इथे कोरोना चाचण्या करण्याचंही धोरण सरकारने ठरवले आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांन वेगळे करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करतंय. एकूणच लॉकडाऊनचा अर्थ वर्षभरात बदलला आहे. अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागलाच, तर त्याचं काटेकोरपणे पालनही गरजेचं आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *