पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा
News24सह्याद्री -
7 नोव्हेंबरला मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा
मुंबई -
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. 7 नोव्हेंबरला या मोर्चाला पंढरपूरमधून सुरुवात होणार आहे. 20 दिवसांचा पायी प्रवास करत सर्व आंदोलक मंत्रालयावर धडक देणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आली आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई असा जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment