मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शरद पवारांना फोन
News24सह्याद्री -
मुंबई -
सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून, या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे. मला राज ठाकरे यांचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंसोबत भेटण्याबाबत अजून काही ठरले नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे.
यापूर्वी, राज ठाकरे यांनी म्हटले होते की, ज्या लोकांना दोन हजार रुपये बिल यायचे, त्यांना आता १० हजार बिल येत आहे. आणि ज्यांना ५ हजार रुपये बिल यायचे त्यांना आता २५ हजार आले आहे. लोकांकडे रोजगार नाहीत. हाताला काम नाही. घरी पैसे येत नाहीत. अशावेळी ते बिल कसे भरणार, असा सवाल उपस्थित करत सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. मात्र राज्यपालांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
No comments
Post a Comment