राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार : वर्षा गायकवाड
News24सह्याद्री -
मुंबई -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले असून, आता राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अशा पालकांना टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. एखाद्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.
शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आदेश -
शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच शाळांमध्ये यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 50 टक्के उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे निर्देश ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी लागू असणार आहेत.
No comments
Post a Comment